एसआरपीएफ जवानांच्या हक्कासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना करणार उपोषण
MahaNews LIVE
मुंबई : शासनाने बदलीसाठी १५ वर्षांच्या सेवाज्येष्ठतेचा नियम लावल्याने राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) जवानांमध्ये नाराजी आहे. या नव्या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि एसआरपीएफ जवानांच्या न्याय्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे. बदलीबाबत पूर्वीप्रमाणे १० वर्षांच्या सेवाजेष्ठतेचा नियम कायम ठेवावा अशी मागणी करण्यात येणार आहे. राज्य राखीव दलाचे १६ बलगट असून कोल्हापूरसह पुणे, जालना, दौंड, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, गडचिरोली, हिंगोली, संभाजीनगर, गोंदिया आदी ठिकाणी सुमारे २० हजार जवान कार्यरत आहेत. गोंदिया, गडचिरोली या नक्षलग्रस्त भागांत १५ तुकड्या तब्बल नऊ महिने तर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणी दोन चार महिने कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी तैनात केल्या जातात. या जवानान महिनोन महिने परिवारापासून अलिप्त रहावे लागत आहे. २००१ पूर्वी बदलीसाठी २५ वर्षांच्या सेवाज्येष्ठतेचा नियम होता, मात्र नंतर तो बदलून १० वर्षांचा करण्यात आला. २००१ पासून २०१६ पर्यंत १० वर्षांच्या सेवाज्येष्ठतेनुसार जवानांची जिल्हा बदली व्हायची, मात्र ऑक्टोबर २०१६रोजी पुन्हा बदल करून बदलीसाठी १० वर्षाएवजी १५ वर्षाची सेवाज्येष्ठता करण्यात आली आहे. शासनाच्या या धोरणाबाबत एसआरपीएफ जवानांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकारी, सरकारदरबारी पाठपुरावा केला. शिवाय कोर्टात हि धाव घेण्यात आली मात्र, न्याय मिळाला नसल्याने एसआरपीएफ जवान हतबल झाले आहेत. मात्र एसआरपीएफ जवानांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.

- Comments
- Leave your comment